कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये स्वबुद्धिमत्ता वापरण्याचे ज्ञान युवकांनी अवगत होणे गरजेचे : प्रा. डॉ. राहुल पालके
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : हे युवका जागा हो, लोकशाहीचा धागा हो ! या वाक्यांनी सुरुवात करून राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये युवकांचे योगदान स्पष्ट करताना लोकशाही दृढ करण्यासाठी युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात स्वबुद्धिमत्ता विकसित करण्याचे ज्ञान युवकांना गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राहुल पालके यांनी केले. त्यासाठी युवकांनी व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देणाऱ्या समाजसुधारकांचा व विचारवंतांचा अभ्यास आवश्यक आहे.
राष्ट्रीय युवक दिनानिमित्त जय जगदंबा शिक्षण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे बोलत होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व हुतात्मा दिन असे हे या कार्यक्रमाचे औचित्य होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य वाघमारे सर, कुलकर्णी सर व मस्के सर हे उपस्थित होते.
युवक हा देशाचा कणा असून भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.ध्येय व स्वप्नपूर्तीसाठी युवक उभा राहतो. अशक्य ते शक्य करण्याची धारणा त्याच्यात असते. ध्येयपूर्तीच्या काळात कठीण कामे तडीस जातात. त्यासाठी युवकांनी ज्ञानार्थी होण्याबरोबरच विचारार्थी व कृतीप्रवण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा सखोल विचार करणे गरजेचे आहे.
काळाशी सुसंगत असताना कुसंगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो याची त्याला जाणीव त्याला हवी. समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करून त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे.समाजमाध्यमे आपल्यापेक्षा प्रभावी होऊन आपल्याला त्यांनी गुलाम करू नयेत याचा विचार त्यांनी करणे उपयुक्त आहे.
वाचनाची गोडी असण्याबरोबर अभ्यास पूरक व अभ्यासेतर बाबींमध्ये त्याने अग्रेसर असावे. संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे.आपल्या क्षमतांचा विचार करून त्याने करिअर निवडावे तसेच त्यामध्ये योगदान द्यावे असाही विचार त्यांनी मांडला. डॉ. पालके यांनी विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या युवकांचा आढावा घेत समाज, शिक्षण,कला, संस्कृती, क्रीडा साहित्य, राजकारण अशा विविध क्षेत्रातील कार्यरत युवकांचा ध्यास व विकास यावर त्यांनी प्रकाश टाकला.
धर्माची वैज्ञानिक चिकित्सा करून विवेकानंदाच्या विचारांचा जागर केला.याप्रसंगी कुलकर्णी सर व मस्के सर यांनी ग्रंथालयांची चळवळ मोठ्या प्रमाणावर चालवण्याची गरज व्यक्त केली. अभ्यासिकामधून युवकांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असाही विचार त्यांनी मांडला.याप्रसंगी युवकांनी आपले विचार मांडत कृतिशील राहण्याचा संकल्प सोडला.





