मित्र विद्यालयात ८३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; संदीप बरडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्मवीर ना. मा गडसिंग गुरुजी मित्र विद्यालय मळेगाव (ता.बार्शी) येथे पोददार स्कूलचे सचिव संदीप बरडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ८३० विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे पॅड, फुल पट्टी,पेनचे वाटप करीत एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास बोराडे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संचारचे उपसंपादक सचिन वायकुळे, संचालक विलास मिरगणे,सरपंच सुजाताताई पाडुळे, उपसरपंच पूजाताई इंगोले, भीमराव दळवी, आदर्श शिक्षिका हेमांगी सांगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष गौस शेख,उपाध्यक्ष उमेश क्षीरसागर, गुलाब शेख, विकास ढेंगळे यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर गडसिंग गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्मार्ट अकॅडमीचे प्रमुख सचिन वायकुळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, कर्मवीर गडसिंग गुरुजी यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली केली.विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याग,समर्पणवृत्ती,कष्ट करण्याची तयारी ठेवा.
चांगले संस्कार हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे आपले आचरण नेहमी शुद्ध ठेवा. सूर्याप्रमाणे तेजोमय जीवन जगा. जगण्याचा अर्थ सांगणारा सूर्य म्हणजेच आपले आई वडील आहेत. विमानास उंच भरारी घेण्यासाठी तीन चाकांची गरज असते. तसेच आपल्या जीवनात देखील विमाना प्रमाणे पुढचे चाक म्हणजे ज्ञानदान करणारे आपले गुरु आहेत, आणि पाठीमागची दोन चाके म्हणजे आपले आई-वडील आहेत. उंच भरारी घेण्यासाठी आयुष्यात या तिघांची खरी गरज आहे.
संदीप बरडे यांनी सामाजिक जाणीवेतून सहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. असे विचार सचिन वायकुळे यांनी व्यक्त केले. संदीप बरडे बोलताना म्हणाले, हालाकीची परिस्थिती हाच माणसाचा खरा गुरु असते. त्यामुळे परिस्थितीची जाण ठेवत जीवनात एक वेगळी उंची गाठा. आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्या यश नक्की मिळेल असे विचार संदीप बरडे यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच सुजाता पाडूळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव दळवी यांनी केले.सूत्रसंचालन व आभार गौस शेख यांनी मानले.




