भाषा विकास व संवाद कौशल्यांमधून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो: प्रा. डॉ. कल्याण साठे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भाषा ही मानवाला लाभलेली देणगी आहे भाषाविकास व संवाद कौशल्यांमधून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे मत डॉ. कल्याण साठे यांना व्यक्त केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील पदव्युत्तर इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.कल्याण साठे यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. राहुल पालके, डॉ. अशोक अनमुलवार , डॉ. विजयकुमार भांजे हे उपस्थित होते.
डॉ. साठे म्हणाले, शब्दकोश व विश्वकोश याची निकड भाषा शिकताना गरजेची आहे. इंग्रजी विषयात म्हणी व वाक्यप्रचार यांचा सुयोग्य वापर करणे हे कौशल्याचे काम आहे. शब्दसंपत्तीच्या जोरावर भाषा व संवाद कौशल्ये विकसित होवू शकतात. शब्दाची व्युत्पत्ती समजून घेतल्यास योग्य अर्थ समजून घेता येतो. संदर्भग्रंथाचा सुयोग्य उपयोग करणे गरजेचे आहे. साहित्याबरोबर व्याकरणही तितकेच महत्त्वाचे आहे.भाषा शिकण्यासाठी You have to murder it असा मिश्किल सल्लाही प्रसंगी ऐकायला मिळाला. प्रयत्नपूर्वक सराव केल्यास भाषा कमविता येते. साठे सरांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.राहुल पालके यांनी इंग्रजी भाषेच्या विविध घटकांची माहिती घेण्यासाठी पुस्तकांचा संदर्भ घ्यावा असे आवाहन केले.त्यांनी भाषेवर व व्याकरणावर प्रभुत्व मिळवण्यासाठी दररोज सरावाची गरज आहे.त्यासाठी भाषातज्ञांची मदत घ्यावी असेही सांगितले. डॉ. भांजे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुढील काळात सरांनी सहकार्य करावे अशा अपेक्षा व्यक्त त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात बल्लाळ, मुळे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.




