कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने ऊस उत्पादन वाढीसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित तंत्रज्ञान प्रकल्पाचा भव्य शुभारंभ नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्री,रांजणी (ता. कळंब) येथे पार पडला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष ठोंबरे, विविध साखर कारखान्यांचे चेअरमन,कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, संचालक मंडळ, प्रवर्तक, शेतकरी सभासद तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पुजार यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य असल्याचे नमूद केले.नॅचरल उद्योग समूहाने एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेतलेली ही पुढाकारात्मक सुरूवात अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यात जिल्ह्यातील ऊस उत्पादनासोबतच इतर पिकांमध्येही एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल,यासाठी नॅचरल उद्योग समूहासोबत समन्वयाने प्रयत्न केले जातील,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन मिळणार असून,शेती अधिक शाश्वत, नफा देणारी व आधुनिक करण्यास या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.




