बार्शी बस स्टँड चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नेमण्याची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील एस.टी. बस स्टँड चौक व रिक्षा स्टँड परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता, येथे कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नेमण्यात यावा तसेच बस स्टँडच्या आवारातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीवर तात्काळ आळा घालावा, अशी ठाम मागणी भगवंत रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत निवेदन देण्यात आले.
बस स्टँड चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून, सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एस.टी. बसेस, रिक्षा आणि नागरिकांची मोठी गर्दी येथे नेहमीच पाहायला मिळते. परिणामी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका वाढत चालला आहे. रिक्षा स्टँड याच परिसरात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
यापूर्वी ट्रॅफिक हवालदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच बस स्टँड परिसरात रिक्षांचा बेशिस्त वापर होत असल्याने चोरी व अनुचित प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन स्वीकारताना बार्शी पोलीस स्टेशनचे पीएसआय माकणे साहेब, मस्के साहेब तसेच बार्शी बस स्टँडचे आगार प्रमुख हांडे साहेब उपस्थित होते. यावेळी भगवंत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे यांच्यासह गणेश शिवपुरे, किरण कांबळे, प्रमोद कांबळे, नागेश जगताप, तुळशीदास क्षीरसागर, अविनाश देवकुळे, चेतन मोरे, महादेव अवघडे, अण्णा अवघडे, नितीन घंटे तसेच मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक उपस्थित.




