क्षयरोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया प्रधानमंत्री कार्यालयाचे उपसचिव डॉ. विपीन कुमार यांचा जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना भेटी

B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : ग्रामीण व शहरी भागांतील क्षयरोगाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन क्षयरुग्ण शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, औषधोपचाराचा नियमित पाठपुरावा करावा व मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री कार्यालयाचे उपसचिव डॉ. विपीन कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) पुणे डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगर आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. साहिल शेख उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले, “क्षयरुग्णांचे लवकर निदान करून उपचार सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी शोध मोहिमा गतीमान कराव्यात. क्षयरुग्णांसाठी आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा व पाठपुरावा करून बरे होण्याचा दर वाढवावा. मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत.”
या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कार्यालयाचे उपसचिव डॉ. विपीन कुमार यांनी पारनेर तालुक्यातील सुपा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर, जिल्हा क्षयरोग केंद्र, आपला दवाखाना नालेगाव, वांबोरी (ता. राहुरी) येथील ग्रामीण रुग्णालय व देहरे (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील क्षयरोग नियंत्रण उपाययोजनांची पाहणी केली. त्यांनी कामकाजाची माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या.
दौऱ्यादरम्यान जिल्हा क्षयरोग केंद्र, अहिल्यानगर येथे सहा क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत योगदान देणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.