विकसित भारत घडवण्यासाठी कौशल्य कुशल विद्यार्थी महत्त्वाचा – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी 20 कंपन्यांचे प्रतिनिधी, तर हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर टेक्स्टाईल इंडस्ट्री असल्याने शासकीय आयटीआय मध्ये टेक्सटाईल आधारित प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार
सोलापूर, दिनांक 6 : सन 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे राज्याचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग ही विद्यार्थ्यांना रोजगार कुशल बनवून विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांना कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. कौशल्य कुशल विद्यार्थी हा विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. तरी अशा कौशल्य कुशल विद्यार्थ्यांना उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी द्यावी व कंपनीच्या गरजेप्रमाणे त्यांना घडवावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सोलापूर शहरातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मार्गदर्शन करत होते. यावेळी कौशल्य विकास उपायुक्त अनुपमा पवार, कौशल्य विकास सह आयुक्त संगीता खंदारे, श्रीमती रोहिणीताई तडवळकर, शशिकांत चव्हाण, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य राजेश पटवर्धन यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कौशल्य विकास मंत्री लोढा पुढे म्हणाले की, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य आधारित अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून द्यावी. अशा प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कंपन्यांनी त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना अपडेट करून कामाचा अनुभव द्यावा. कंपनीने त्यांच्या प्रवासात त्यांना अनेकांनी सहकार्य केलेले असू शकते त्याच पद्धतीचे सहकार्य त्यांनी कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही द्यावे. तर विद्यार्थ्यांनीही आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपन्याकडून उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ घेऊन अत्यंत जबाबदारीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर हे कपडा उद्योगाचे मोठे केंद्र आहे, त्यामुळे येथे कपडा उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळाला खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून टेक्स्टाईल आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी दिले. याचा लाभ उद्योजकांना तर होईलच परंतु स्थानिक स्तरावरच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. कौशल्य विकास विभाग नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी या रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट सांगितले. असे मिळावे सन 2008 पासून नियमितपणे घेतले जात असून आज रोजी पर्यंत लाखो विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योग उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आज या ठिकाणी विविध 20 खाजगी कंपन्याचे प्रतिनिधी 2 हजार रिक्त पदांसाठी आलेले आहेत. त्यामुळे येथे आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी या कंपन्याकडून उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून केला.