आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे – महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

0

यंदा दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सद्याची पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकाव आणि पाणी साठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिले. यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा ही कु. तटकरे यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री कु तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,
कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून मंत्री कु तटकरे म्हणाल्या की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. तसेच निश्चित कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी.

रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. मागील घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाची पाहणी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत करण्यात यावी. जी गावे दरडप्रवण क्षेत्रात येतात त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या गावांची परिपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडे संकलित असावी. अचानक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ मदत कार्य पोहोचविणे शक्य होईल असेही कु. तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व शाळा, रुग्णालये, पूल, साकाव, रस्ते यांचे प्राधान्याने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. जेथे डागडुजी करणे शक्य आहॆ तेथे तात्काळ दुरुस्ती करावी. जेथे दुरुस्ती करणे शक्य नाही तेथे पर्यायी व्यवस्था करावी. यामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. यंदा अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरले जाईल. तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल असेही कु तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पावसाळ्याच्या पूर्ण कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी. रुग्णवाहिका वाहन चालकासह सुसज्ज असाव्यात. त्यांची आवश्यक दुरुस्ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. सर्व प्राथमिक केंद्रात मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पावसाळ्यात सर्प दंशाच्या मोठया प्रमाणावर दुर्घटना घडतात. त्यासाठीची आवश्यक सर्व औषधे उपलब्ध असावेत असे सांगून मंत्री कु तटकरे म्हणाल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्रीस्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल असेही सांगितले.

जिल्ह्यातील ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे अशा सूचनाही कु तटकरे यांनी केल्या. जिल्ह्यातील नद्या, तलाव तसेच पारंपरिक पाणवठे यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने करा. ज्योयोगे पाणीसाठा वाढेल तसेच जलस्रोत्यांचे संवर्धन होईल. तसेच शहरातील सर्व नाले सफाई येत्या चार दिवसांत पूर्ण करावी असे निर्देश कु तटकरे यांनी आज दिल्या.पशु संवर्धन विभागाने देखील या काळात खाजगी डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घ्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होते आहॆ. या नुकसानीचे जैसे थे पंचनामे कृषी विभागाने तात्काळ करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा असे निर्देश कु तटकरे यांनी दिले.

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गाव पातळीवर त्याची ठळक पणे प्रसिद्धी करण्याचे निर्देश मंत्री कु तटकरे यांनी दिले. शाळा तसेच समाज मंदिरे, सभागृह येथे पण त्याची प्रसिद्धी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्याबरोबरच आवश्यक ते सर्व मदत कार्य वेळेत करावे असे निर्देश मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरनाद्वारे दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या