संविधान गौरव संमेलनलोकांच्या मनामनात रुजवावे संविधान – पालकमंत्री संजय शिरसाट

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : घर घर संविधान या अभियानाअंतर्गत संविधानाची महती ही घराघरापर्यंत पोहोचवून लोकांच्या मनामनात संविधान रुजवायचे आहे. त्यासाठी आपण कार्यरत राहू या,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

‘घर घर संविधान’ या अभियानाचा भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या मार्फत आज संत एकनाथ रंगमंदिर येथे संविधान गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, नंदकुमार घोडेले, विलास जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधान निर्मिती प्रक्रियेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका याविषयावर प्रकाश टाकला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार असल्याचे सांगितले. आपल्या घटनेतील सगळ्यात महत्वाची आणि वेगळी बाब म्हणजे सामाजिक न्यायाचे तत्व होय.

प्रधानसचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, संविधानाची खरी महती ही आहे की, हा देश जो विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता तो देश एकसंधपणे जोडला गेला. देशाचा आर्थिक विकास, त्यासाठी संसद, न्यायपालिका, कार्यपालिका, माध्यमे अशा सर्व घटकांमध्ये अधिकारांचे विक्रेंद्रीकरण त्यातून केला जाणारा देशाचा कारभार ह्या सर्व बाबी संविधानात संविधानकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून नमूद केल्या. त्यामुळे आजही हा देश एकसंध आहे आणि त्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी या अभियानाद्वारे संविधान हे घराघरापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, घर घर संविधान हे अभियान राबवितांना संविधान लोकांच्या मनामनात रुजवायला हवे. संविधानामुळे सामाजिक न्याय अंमलात येतो. मी स्वतः संविधानाचा लाभार्थी आहे. सार्वजनिक जीवनात काम करतांना संविधानाचे तत्व राबविण्याचा प्रयत्न आपण करत असतो. संविधानामुळे प्राप्त झालेला अधिकार हा लोक हितासाठी वापरायचा. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.

प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन झाले. तसेच पहलगाम हल्ल्यातील मृतांना व शहीद जवानांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या