‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेच्या अंमलबजावणीतून गावे पाणीदार बनविण्यासाठी जनजागृती करणारा जलरथ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून रवाना करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सकाळी हा जलरथ रवाना झाला. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. गावातील जलाशयांमधील गाळ काढुन तो शेतांमध्ये टाकला जावा, त्यातून जमिनीची उत्पादकता वाढावी व जलाशयांची साठवण क्षमता वाढावी, नाल्यांची वहन क्षमता वाढावी यासाठी ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, इंधन इ. बाबींचा खर्च शासनामार्फत करण्यात येतो. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा व आपले गाव पाणीदार बनवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यानिमित्त केले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, भारतीय जैन संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष गौतम संचेती, राज्य महासचिव प्रवीण पारख, प्रकल्प प्रमुख किशोर ललवाणी, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पगारिया, पारस चोरडिया, सफल रायसोनी, अभिजीत हिरप, सतीश लोढा, अविनाश डोढल, पल्लवी डोढल, निकेतन कोठारी, सुनील लोढा, मनीष बनसोड यांची उपस्थिती होती . त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, कैलास पाटील बहुउद्देशीय संस्था, ज्योती फाउंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.