गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल – मुख्यमंत्री

B1न्यूज मराठी नेटवर्क
गडचिरोली : ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘भारत नेट प्रकल्प’ टप्पा एक मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे. आता टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातही उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी. मुंबईतील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्तांबाबत नगरविकास विभाग, बृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्याच्या सूचना देत समितीने चार आठवड्यात अहवाल द्यावा, असे निर्देशी केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी दिले.
राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
मुंबईतील बीएसएनएलच्या मालमत्ता आणि महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा बाबत आयोजित बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय दूरसंचार सचिव नीरजकुमार, बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रावी आदी उपस्थित होते.