धाम नदी संवाद यात्रेचे वाढोणा येथे उत्स्फुर्त स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेली धाम नदी संवाद यात्रा आज आर्वी तालुक्यातील वाढोणा येथे दाखल झाली. येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी, विद्यार्थी यांनी यात्रेचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. गावातून जलजागृती रॅली सुध्दा काढण्यात आली.
यावेळी उपसरपंच जाहेद हुसेन, नदी समन्वयक सुनील राहाणे, भरत महोदय, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, संवाद यात्रेचे आर्वी तालुका नोडल अधिकारी तथा कृषी विस्तार अधिकारी विशाल देवकर, ग्रामपंचायत सदस्य आशा चौधरी, छाया मांडवकर, बेबी बोंडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल हजारे, लोणकर गुरुजी, मंडळ अधिकारी राठोड आदी उपस्थित होते.
धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या धामकुंड येथून यात्रेस प्रारंभ झाल्यानंतर हिवरा तांडा गाव करुन ही यात्रा आज वाढोण्यात पोहोचली. ग्रामंपचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुनील राहाणे व भरत महोदय यांनी चला जाणूया नदीला अभियानाचे महत्व पटवून सांगितले. या अभियानात गावकऱ्यांची काय भूमिका आहे. यावर देखील प्रकाश टाकला. मंगेश वरकड यांनी या अभियानात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
तत्पुर्वी उपसरपंच जाहेद हुसेन यांच्याहस्ते जलजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅली गावात फिरविण्यात आली. रॅलीत गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नद्या स्वच्छ सुंदर करण्यासोबतच नदीचे पावित्र्य राखण्याचे आवाहन यावेळी केले. रॅलीचा समारोप धाम नदीच्या तिरावर करण्यात आला.
यावेळी नदी समन्वयकांनी नदीचा तट, प्रवाह, प्रदुषण, जैवविविधता, जलस्त्रोत आदींची गावकऱ्यांकडून माहिती घेतली व त्यांच्याकडून प्रश्नावली भरुन घेतली. नदीच्या काठावर गावकऱ्यांसोबत बैठक घेत सर्वागिन अभ्यास केला. उपसरपंच जाहेद हुसेन यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. आभार कृषी विस्तार अधिकारी विशाल देवकर यांनी मानले. कार्यक्रमाला तलाठी .सिरसाठ, स्वच्छ भारत मिशनचे सतिश लांजेवार, ग्राम रोजगार सेवक मोहन केवटे, विजय आढाव, धनश्री मराठे, सोनल शेटे आदी उपस्थित होते.