श्रीधर कांबळे यांच्या कार्याचे अनुकरण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लोकांनी केलं पाहिजे – आ प्रा. जयंत अजगावकर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्रीधर कांबळे यांनी आपल्या शिक्षण सेवेमध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम करून बार्शी शहर व परिसरामध्ये आपल्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक उपक्रमशील शिक्षक असलेले श्रीधर कांबळे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक, कला प्रिय शिक्षक, समाजसेवक ,क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे, रक्तदानाच्या चळवळीमध्ये काम करणारे अशा विविध रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात .त्यांचे विद्यार्थी समाजातल्या अनेक ठिकाणी उत्तम कार्य करीत आहेत. समाजाला समृद्ध करणाऱ्या शिक्षकांची आज गरज आहे. श्रीधर कांबळे यांच्या कार्याचे अनुकरण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे. कांबळे यांचं काम शब्दांमध्ये मावत नाही. श्रीधर कांबळे यांनी बार्शी शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. श्रीधर कांबळे यांनी ‘हाती जे घ्याल, ते तडीस न्याल’ अशा प्रकारची भूमिका सातत्याने ठेवल्यामुळे आज त्यांचा गौरव करत असताना आम्हाला आनंद होत आहे.” असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सदस्य शिक्षक आमदार प्रा. जयंत आजगावकर यांनी काढले.
31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार श्रीधर कांबळे हे आपल्या शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने बार्शीच्या आदर्श मंगल कार्यालयामध्ये सिल्वर जुबली शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती समारंभप्रसंगी आ. आजगावकर बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार राजेंद्र राऊत , शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, शिवसेनेचे शिंदे सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे ,वरिष्ठ शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, स्थानिक नियामक मंडळाच्या चेअरमन वर्षाताई ठोंबरे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, आसिफ भाई तांबोळी, जेष्ठ पत्रकार राजा माने, प्रा. तानाजीराव ठोंबरे ,यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण दादा बारबोले ,यशदाचे संचालक शिवाजीराव पवार ,माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, माजी शिक्षणाधिकारी श्री शिवदास नलवडे, माजी गटशिक्षणाधिकारी श्री धावणे, पुणे महापालिकेचे नगरसेवक रवी पाटोळे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दयानंद आढागळे, बार्शी शहरातील जेष्ठ नेते एड. अनिल पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीमती मीनाक्षी पेठे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी श्रीधर कांबळे यांच्या कारकिर्दीचा गौरव करत असताना बार्शीच्या भगवंत महोत्सवातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला .पत्रकार राजा माने प्रा. तानाजीराव ठोंबरे यांनी श्रीधर कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत असताना काम पुढे चालू ठेवा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत यापुढील काळात बार्शी शहर व तालुक्यामध्ये निराळ्या प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपले काम सातत्याने पुढे राहावे यासाठी योगदान देण्याचा आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी श्रीधर कांबळे यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करत बार्शी शहरातील गेल्या 35 वर्षांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आलेख मांडला. माजी विद्यार्थी पत्रकार सचिन अपसिंगकर, सोशल मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे निरंजन सवने यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना श्रीधर कांबळे यांनी बार्शीकर यांनी आजवर दिलेल्या सहकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आणि यापुढील ही काळात आपण आपले काम असेच पुढे ठेवू ,अधिक जोमाने हे काम करत राहू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पतसंस्थेचे चेअरमन सतीश होनराव व कांबळे परिवाराचे संजय कांबळे यांनी केले.
सूत्रसंचालन नीता देव व सूर्यकांत आदलिंगे यांनी केले. या कार्यक्रमास बार्शी शहर व परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या साहित्य, कला क्रीडा, सामाजिक ,राजकीय ,उद्योग ,आरोग्य या सर्व क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला श्रीधर कांबळे यांच्या आई वडिलांच्या लग्नाला 63 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा लग्न वाढदिवसाच्या केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.